Give Courage To Fight And Wings To Fly For These Two-Parent | Milaap
Give Courage To Fight And Wings To Fly For These Two-Parent Less Kids
  • SP

    Created by

    Sarthak P Narvate
  • Og

    This fundraiser will benefit

    Orphan girls

    from Hinganghat, Maharashtra

आयुष्याची खडतर परीक्षा देणाऱ्या सीमा व लक्ष्मी....

लॉकडाउन सुरु होते..अशा कठीण काळात सर्वांनाच अनेक समस्या व अडचणीचा सामना करावा लागत होता. सगळे स्वतः ची काळजी घेऊन इतरांना मदत करत होते. गावातीलच मंडळीकडून गावाजवळच वस्तीवर राहणाऱ्या आणि समाजापासून दूर असणाऱ्या पारधी बांधवांबद्दल  माहिती मिळत होती. मधल्या काळात अधून मधून शाळेत, गावात व पारधी वस्तीवर त्यांची भेट घेण्यास आम्ही शिक्षक व काही शा.व्य. स. सदस्य निघालो.

मनात एक वादळ सुरु होतं.... आजवर दुर्लक्षित, मागास आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा समाज म्हणून ज्यांच्यावर समाजाने शिक्का मारला अशा पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे, त्यांच्यावर संस्कार करावे असा आम्हा शिक्षकांचा नेहमीच प्रयत्न असतो. मात्र प्रगतीच्या मार्गात अनेक नव्या समस्या व संकट उभे राहतात. असेच एक संकट सीमा व दिक्षा वर आलेले. शा.व्य.समिती सदस्य राजूभाऊ पाझारे यांनी कळवले होते की, सीमा व लक्ष्मी फार अडचणीत आहेत. मुख्य म्हणजे त्यांनाच भेटायला आम्ही आलो होतो. तसेही वस्तीवरील छोट्या मुलांच्या भेटीचा आनंद फार  मोठा असतो. कारण ते नेहमीच फार आपुलकीने आमची वाट बघत असतात . सीमा व लक्ष्मी ह्या राजहंस भोसले ह्यांच्या मुली. काही वर्षांआधी या पोरींच्या आईवडिलांचे आजाराने निधन झाले.  ह्या दोघी आजी-आजोबांबरोबर राहतात. परंतु आजी-आजोबाही सतत आजारी राहत असल्याने त्यांची परिस्थिती फार बिकट झालेली.

लॉकडाउनच्या प्रतिकूल वातावरणात गरजुना मदत करणारी संस्था नाम फॉउंडेशनकडून मिळालेल्या धान्यमालाच्या किट पारधी वस्तीवरील काही परिवारांसाठी आम्ही सोबत घेऊन आलेलो. त्यात सीमा व लक्ष्मीसाठी ही किट आणली होती. त्या निमित्ताने त्यांना थोडी मदत होईल व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यास त्यांच्यासाठी काही करता येईल असा विचार करून त्यांची भेट घेण्याचे ठरवलेलेच होते. आम्ही वस्तीवर पोहोचताच सगळी चिमुकली मंडळी आनंदाने गोळा झाली आणि आम्ही निघालो सीमा व लक्ष्मीच्या घराकडे.

घराचे अंगणच त्यांची हलाखीची परिस्थिती सांगत होते. सीमाच्या अंगणात तिरप्या उभ्या खाटेच्या सावलीत तिचे आजोबा आराम करत होते. वृद्धत्व व आजाराने दोन्ही पाय अधू झालेले. त्यांची ती अवस्था बघून वाटत होते की, ते उभेही होऊ शकत नसावे. बाहेरील आमचा आवाज ऐकून आजीही झोपडीतून सरकत सरकत दारात आली. त्यांच्या या अवस्थेबद्दल थोडी कल्पना होती, पण प्रत्यक्षात बघून मन पार हेलावून गेले. हेच का ते दोघे.... ह्या मुलींचा आधार. त्यांचं ते आजारी वृद्धत्व सीमा व लक्ष्मीची काळजी घेण्यासारखे नव्हते. तर उलट त्यांचीच जबाबदारी ह्या पोरींवर आलेली होती. आम्हाला ह्या दोघींची काळजी वाटू लागली. कसे जगत असतील ही दोन्ही लेकरं?  माझ्या चेहऱ्यावरील चिंतेचे भाव मनोजने ओळखले. मनोज आमच्याच शाळेचा विद्यार्थी ह्याच वस्तीवर लहानाचा मोठा झाला. थोडा शिकलेला व सुधारलेला....त्याची बायको ही त्याच्यासारखीच समजूतदार व छान आहे. तो लक्ष्मीच्या घराशेजारीच राहतो. तो म्हणाला.. "तुम्ही काळजी करु नका आम्ही सगळे शेजारी ह्यांना मदत करतो व काळजी ही घेतो यांची. ऐकून बरे वाटले! त्या वस्तीवरील पारधी समाजाची लोकं ज्यांचं पारध हाच जीवनाचा मुख्य व्यवसाय व आधार...अशा क्रूर वाटणाऱ्या लोकांच्या मनाचा मोठेपणा व जिव्हाळा बघून कौतुक वाटले. खरंच मुळात ही लोकं मनानं खूप प्रेमळ व प्रामाणिक असतात, आम्हांलाही खूप जीव लावतात. या लोकांना मुख्याध्यापक सरांनी ही कोविड 19 या आजाराचे संसर्ग होऊ नये, यासाठी काय-काय काळजी घ्यावी हे समजाऊन सांगितले. ही लोकं शिक्षकांचे फार मनापासून ऐकतात व अवलंबतात. त्यांचा शिक्षकांवर खूप विश्वास असतो.

पोरी लहान असल्यामुळे अनंत अडचणीचा सामना करतात. मुलींना या वयात आईवडिलांचे छत्र तर नाहीच पण असंख्य गोष्टी पासून त्या दुरावलेल्या आहेत. त्या मुलींना व आजीआजोबांना जेवण व बाकी मदत शेजारचे त्यांचे बांधव करतात, पण तीही किती दिवस करणार आहेत बिचारी ! म्हणतात ना सगळं सोंग आणता येते पण पैशाचं सोंग आणता येत नाही. दिवस काढतायेत बिचाऱ्या! कसं करत असतील आईवडिलांविना या पोरी, अशी साधी आठवण जरी झाली तरी अंगावर शहारे येतात,  रहायला घर नाही की खायला अन्न नाही, जगतायेत माणुसकीच्या नावावर. इथं स्वतः कसं जगायचं हा प्रश्न तर आहेच पण सोबत आजी- आजोबांचाही आधार व्हायचं आहे. वय झाल्यामुळे आजी आजोबा काहीच करू शकत नाहीत. या खेळण्या बागडण्याच्या वयात इतकी मोठी जबाबदारी यांच्यावर येऊन पडली आहे की शाळा शिकावं की आजी आजोबांचं करावं हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. या अशा परिस्थितीत बिचाऱ्या सीमा व दिक्षाचं आयुष्य मला अंधकारमय दिसतं ! आता जो काही यांच्या आयुष्यात बदल होईल तो केवळ नियतीच घडवून आणील. या मुलींना पाहिलं की सगळेजण हळहळ व्यक्त करतात त्यापेक्षा जास्त काय करू शकेल कुणी! प्रत्येकजण आपआपल्या परीने जे जे शक्य होईल तो आनंद या मुलींच्या आयुष्यात भरण्याचा प्रयत्न करतात. पण राहून राहून नेहमी वाटतं की बिचाऱ्या या कोवळ्या जीवांचा काय दोष की ज्यांच्या वाट्याला हे प्रचंड दुःख आलेलं आहे.

आमची परत निघायची वेळी झालेली. निघण्याआधी आम्ही ह्या मुलींना जमेल तेवढी मदत करण्याचे ठरविले. काही गरज पडल्यास आम्हाला कळवत जा म्हणून सीमा व लक्ष्मीला सांगितले.
आमच्या भोवती गोळा असलेल्या पोरांचे गोड निरागस चेहरे पाहिले आणि आठवलं...मनात फक्त सीमा, लक्ष्मीचेच विचार सुरु असल्याने ह्या पिल्लांकडे माझं लक्षच नव्हतं. गडबडीत ह्या मुलांसाठी खाऊही आणायचा राहून गेलेला. म्हणून मनोजला थोडे पैसे देऊन ह्या चिल्ल्या - पिल्ल्यासाठी खाऊ आणायला सांगितले. मुले खुश झालीत. आम्हीही परत निघतच होतो. सगळी चिमुकले वस्तीच्या बाहेर पर्यंत आम्हांला सोडायला आली होती. तेथून निघाल्यावरही आम्ही दृष्टीआड होईपर्यंत हात हलवून त्यांचा टाटा बाय बाय सुरूच होता.... आणि माझाही...

📝दिपाली सावंत
शिक्षक
वर्धा

Read More

Know someone in need of funds? Refer to us
support